प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह निधी मिळण्यात लघुपाटबंधारे विभागाचा अन्याय – ज्योती ताई ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने मदतीची मागणी
मंगरुळपीर (जि. वाशिम) –
जिल्ह्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत सानुग्रह निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अडचणीत सापडले असून, संबंधित विभागाकडून सुरू असलेली चालढकल व दुर्लक्षामुळे या शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप समाजसेविका सौ. ज्योती ताई मनोज ठाकरे यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी दिनांक 10 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी वाशिम व उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर यांच्याकडे निवेदन देऊन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सानुग्रह निधी वितरित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली.
सन 2006 मध्ये मंजूर झालेल्या मोठ्या धरण प्रकल्पासाठी शासनाने एकूण 832 कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. त्यानंतर 2024 मध्ये प्रती हेक्टर 1 लाख रुपयांचा सानुग्रह निधी देण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्या आदेशानुसार मा. पालकमंत्री ना. शेखर बावनकुळे यांच्या हस्ते 16 एप्रिल 2025 रोजी काही लाभार्थ्यांना (उदा. ओक विलकर) पाच लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, उर्वरित शेकडो शेतकऱ्यांना अद्याप एक रुपयाचाही निधी मिळालेला नाही.
संबंधित कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग वाशिम यांच्या कार्यालयाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही निधी वितरणात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हा निधी लवकरात लवकर वितरित करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्त शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही सौ. ठाकरे यांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Comments
Post a Comment