अकोल्यातील धाड प्रकरणात सर्व अधिकाऱ्यांना शनिवारी पुण्यात बोलवले आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्या ४५ अधिकाऱ्यांना पुण्यात येण्याचे फर्मान राज्याचे कृषी संचालकांनी सोडले आहे. त्या विषयावर आज बैठक होत आहे.
अकोला शहरात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावावर कृषी विभागाच्या पथकाने धाडी टाकल्या होत्या. या पथकात अधिकार नसलेले अनेक खाजगी व्यक्ती असल्याचा आरोप होत आहे. या पथकात कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा स्वीय सहायक असल्याच्या बातम्या आल्या होत्या. या प्रकरणावरुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले होते. या प्रकरणातील गोंधळ अन् सरकारवर होत असलेली टीका पाहता मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना विचारणा केल्याचेही समोर आले होते. आता या प्रकरणावर राज्याचे कृषी संचालकांनी ४५ अधिकाऱ्यांना पुण्यात बोलवले आहे. त्यासंदर्भात त्यांनी टीव्ही ९ मराठीला माहिती दिली.
बियाणांचा अहवाल आल्यावर…
अकोल्यात ती धाड नव्हती तर ती कारवाई होती, असा दावा राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केला आहे. बोगस बियाणे किंवा कीटकनाशके यांची विक्री रोखण्यासाठी या कारवाया आम्ही दरवर्षी करतो, असे त्यांनी म्हटले आहे. कारवाईत सहभागी असलेले सर्व जण अधिकारीच होते. त्या सर्व अधिकाऱ्यांना म्हणजेच जवळपास ४५ अधिकाऱ्यांना मी बैठकीसाठी बोलावले आहे. हे सगळे आधिकारी अकोल्यात झालेल्या धाडी संदर्भातील आहेत. या बैठकीत सगळ्यांची चौकशी करत कागदपत्रांची देखील पडताळणी आम्ही करणार आहोत, असे विकास पाटील यांनी म्हटलंय.
बियाणांचा अहवाल आल्यावर…
कारवाईत सापडलेले सगळे बियाणे हे तपासणीसाठी पाठवले आहेत. मात्र बियाणांचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही. लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होईल, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले की, त्या अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पूर्ण अहवाल कृषिमंत्री आणि राज्य सरकारला पाठवला जाईल जर काही गैर झाला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल. या कारवाईत सहभागी कृषी खात्यातील संबंधित सर्व तंत्र अधिकाऱ्यांना अहवाल व कागदपत्रांसह हजर राहण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या विविध कंपन्यांच्या गोदामांची ७ ते ९ जून दरम्यान या पथकाने तपासणी केली होती.
Comments
Post a Comment